भारत-पाकची इच्छा असल्यास काश्मीरप्रश्नी मध्यस्थीला तयार; नॉर्वेच्या पंतप्रधानांची ग्वाही
भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या काश्मीरप्रश्नावरुन नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी मोठे विधान केले आहे. जर या दोन्ही देशांची संमती असेल तर काश्मीरप्रश्नी आम्ही मध्यस्थाची भुमिका निभावू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. सोलबर्ग या तीन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दरम्यान त्यांनी सोमवारी दिल्लीत बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
तसं तर काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये क्षमता आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कोणाही बाहेरच्या देशाच्या मदतीची गरज नाही. लष्कराच्या जोरावर आपण प्रश्न सोडवू शकतो मात्र, तरीही अडचणी कायम राहतात. त्यामुळे अशा प्रश्नांवर शांततेत तोडगा काढायला हवा. मला आशा आहे की, या दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरु होईल. दोन्ही देशांचा सर्वाधिक खर्च हा लष्करावर होतो. कारण तुमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण नाही. तुमचा सर्वाधिक पैसा हा नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च व्हायला हवा, असे सोलबर्ग यांनी म्हटले आहे.