breaking-newsआंतरराष्टीय

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी पालनाबाबत सहमती

इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांविषयक महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) आज हॉटलाईनवरून विशेष संपर्क साधला गेला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शस्त्रसंधी पालनाबाबत सहमती झाली.

भारत आणि पाकिस्तानी लष्करांच्या डीजीएमओंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि सीमेवरील सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. शांततेच्या निश्‍चितीसाठी आणि सीमांलगत राहणाऱ्या नागरिकांच्या यातना टाळण्यासाठी सद्यस्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक पाऊले उचलण्याविषयी यावेळी दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली.

दोन्ही देशांत 2003 मध्ये शस्त्रसंधी करार झाला. त्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्याबाबत आणि यापुढे शस्त्रसंधीचे उल्लंघन टाळण्याविषयीही दोन्ही देश सहमत झाले. संयम पाळण्याची आणि कुठली समस्या उपस्थित झालीच तर ती हॉटलाईन संपर्क आणि ध्वज बैठकांच्या माध्यमातून सोडवण्याचीही तयारी दोन्ही बाजूंनी दर्शवली. पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा करतात. त्या माऱ्याचे लक्ष्य अनेकदा सीमांलगत राहणारा भारतीय निवासी भाग ठरतो.

पाकिस्तानी सैनिकांच्या थैमानामुळे भारतीय रहिवाशांमध्ये घबराट पसरून त्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागतो. पाकिस्तानी सैनिकांच्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्या प्रत्युत्तरात मोठी हानी होत असल्याने पाकिस्तानला उपरती झाल्याचे मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button