भाजप सरकारविरोधात टपाल कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
- ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे टपाल सेवा ठप्प
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – देशभरातील सर्वंच क्षेत्रातील कामगारांचा मोदी सरकारने व केंद्रीय संचार मंत्री मनोज सिन्हा यांनी अपेक्षाभंग केला आहे. तसेच, वेळोवेळी कामगारांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता पोस्ट कर्मचा-यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या फसव्या सरकार विरुध्द तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आणि बेमुदत काम बंद करण्याचे आवाहन ‘नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक’ पुणे विभागाचे सचिव राजू करपे यांनी केले आहे.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक या राष्ट्रीय संघटनांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि. 18 डिसेंबर) पासून देशातील दोन लाख सत्तर हजार टपाल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्याअंतर्गत चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, पिंपरी कॉलनी, पिंपरी (खराळवाडी), थेरगाव, वाकड, हिंजवडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, औंध, सांगवी, प्राधिकरण, आकुर्डी, रुपीनगर, दापोडी, खडकी, देहूरोड, देहूगाव येथील ग्रामीण डाक सेवक कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. राजू करपे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथील टपाल कार्यालयासमोर टपाल खात्याविरुध्द धरणे आंदोलन सुरु आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना करपे म्हणाले की, यापुर्वी टपाल कर्मचा-यांनी मे 2018 मध्ये सलग सोळा दिवसांचा संप केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ‘कमलेश चंद्रा कमिटी’च्या शिफारशी लागू करण्याचेही आश्वासन दिले होते. परंतू सरकारला मागील सहा महिन्यात दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. ‘कुंभकर्णाची’ झोप घेतलेल्या व देशभरातील टपाल कर्मचा-यांची फसवणूक करणा-या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी व कामगारांच्या न्याय्य हक्क व मागण्या मान्य करण्यासाठी आता बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही. ‘कमलेश चंद्रा कमिटी’ ने शिफारस केल्याप्रमाणे बारा, चोविस, छत्तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-यांना शिफारशी प्रमाणे वेतनवाढ द्यावी. पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी द्यावी. पेंशन फंड टिआरसीएच्या दहा टक्के कपात करावी. तीस दिवसांची रजा व एकशे ऐंशी दिवसांची संचयीत रजा मंजूर करावी. एक माणसी डाक घरात दोन कर्मचा-यांची नियुक्ती करावी. सर्व कर्मचा-यांना नियमित कर्मचा-यांचा दर्जा देण्यात यावा.