भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करत खासदार सावित्रीबाई फुलेंचा राजीनामा
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी पक्षासमोर अडचणी निर्माण करणाऱ्या चर्चित खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बहराईच मतदारसंघाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भाजपा समाजात फूट पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला.
काही दिवसांपूर्वीच राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फुले यांनी भाजपावर टीका केली होती. राम मंदिर हे मंदिर नसून देशातील ३ टक्के ब्राह्मणांच्या कमाईसाठीचा धंदा आहे, असा गंभीर आरोप केला होता. तसेच भगवान राम हे शक्तीहीन आहेत. त्यांच्यात शक्ती असते तर अयोध्यामध्ये तेव्हाच राम मंदिर उभारले असते, असेही ते म्हणाले होते.
त्याचबरोबर भगवान हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते, असेही म्हटले होते. राम हे मनुवादी होते. जर हनुमान दलित नसते तर त्यांना मनुष्य का बनवण्यात आले नाही ? त्यांना वानरच का केले ? त्यांचा चेहरा काळा का केला, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली होती.
तत्पूर्वी आरक्षणाच्या मुद्यावरुनही त्यांनी भाजपाला घेरले होते. मी भाजपाची नव्हे तर दलिताची मुलगी आहे. आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. मी जर खासदार झाले नसते तर भाजपाला बहराईच मतदारसंघ राखता आला नसता. भाजपाला नाईलाज होता. त्यांना विजय मिळवून देणारा उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी मला तिकीट दिले. मी त्यांची गुलाम नाही. खासदार होऊनही जर मी माझ्या लोकांसाठी बोलू शकत नसेल तर काय फायदा, असा सवाल त्यांनी केला होता.