बंडखोरांना भाजपचा झटका : सात जणांना केले पक्षातून निलंबित
अहमदनगर – महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणाला रंग चढू लागला असून, राज्यातील सत्ताधारी भाजपला बंडखोरीने ग्रासले आहे. बंडखोरी करून रिंगणात उतरणाऱ्या ७ बंडखोरांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे.
मनपा निवडणुकीसाठी भाजपने २७० इच्छुक उमेदवारांत गुणानुक्रम व पक्षनिष्ठा पाहून उमेदवारी जाहीर केली. परंतु इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे भाजपचे ७ निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊन अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले. पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरा यांनी बंडखोरांवर कारवाईबाबतचे आदेश दिले. शहर जिल्हाध्यक्ष व खासदार दिलीप गांधी यांच्या आदेशावरुन कारवाई करण्यात आली.
माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, नगरसेविका मनिषा बारस्कर, माजी नगरसेवक शिवाजी लोंढे, प्रतिक बोरसे, प्रितेश गुगळे, गायत्री चोरडीया, आशा विधाते अशी निलंबनाची कारवाई झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी आपापल्या प्रभागात भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मोठे आव्हान दिले आहे. पक्षाचे जुने कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे पक्षापुढे मोठे संकट उभे राहीले आहे.