breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजपाचे अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात – अजित पवार
मुंबई – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. विशेष म्हणजे याचा महाराष्ट्रातील भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारयांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते परत घरवापसी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
गेल्या अनेक काळापासून आघाडीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची कोंडी केली जातेय. त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत होता. परंतु आता ते मोकळेपणाने बोलू शकणार आहेत. तसेच भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणू, असंही अजित पवार म्हणाले आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्ष बदलण्याच्या हालचालींना सुरुवात केली आहे.
भाजपा विरोधात असलेले वातावरण आणि पक्षामध्ये होणारी कोंडी या दुहेरी कात्रीत सापडलेले नेते, आमदार आणि खासदार लवकरच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये परतण्याची शक्यता आहे. तर काही नेते शिवसेनेतही जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.