भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार – प्रकाश आंबेडकर
कोल्हापूर – कर्नाटक विधानसभेचा निकाल काहीही लागो… भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार, असे सूचक विधान भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आम्ही आमच्या पायावर उभे राहाणार असून कुणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. त्यामुळे आमचे अस्तित्व दाखवण्यासाठी पंढरपूरमध्ये 20 मे रोजी राज्यस्तरीय सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित केला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद निर्माण झाला नसताना तो वाद जाणीवपूर्वक निर्माण गेला जातो. या वादात तेल ओतण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. अहिल्यादेवींची बदनामी करण्याचा हा कट आहे. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांनी इतिहासीतील एका व्यक्तीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात मी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा दौरा करून आलो. त्यावेळी कर्नाटकमध्ये टार्गेट इलेक्शन सुरू असल्याचे निदर्शनास आले. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना पाडण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक विधानसभेचा निकाल काहीही लागो… भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार असल्याचे देखील आंबेडकरांनी म्हटले आहे.
या सरकारला कामगार कायद्यात बदल आणायचा असल्याने शहरी नक्षलवाद ही संकल्पना सुरू केली. त्यामुळे कामगार नेत्यांना टार्गेट केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. या मेळाव्याच्या माध्यमातून नव्याने मांडल्या जाणाऱ्या नव्या चुलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.