बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर शांततेत पडला पार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षीची बारावीची परिक्षा आजपासून सुरूवात झाली आहे. पहिला इंग्रजीचा पेपर असल्याने पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या चेह-यांवर किंचितशी नाराजी दिसत होता. तर, असंख्य विद्यार्थ्यांनी हा पेपर अत्यंत सोपा गेल्याच्या समाधानकारक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये 27 केंद्रावर 21 हजार 142 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. सर्व केंद्रांवर सकाळी दहा वाजता पालकांसह विद्यार्थी पोहोचले होते. पहिला इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे अनेक मुला-मुलींच्या चेह-यावरील किंचित नाराजी स्पष्ट दिसत होती. सर्व विद्यार्थ्यांना सकाळी साडेदहा वाजता परिक्षा केंद्रामध्ये सोडण्यात आले. प्रत्येक मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. अनेक परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
परिक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना दहा वाजून 40 मिनिटाला उत्तरपत्रिका हातात दिली. दहा वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिका वाटप झाल्या. अकरा वाजता पेपर लिहिण्यास सुरवात झाली. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच, शिक्षण विभागाने देखील खबरदारी घेवून विद्यार्थ्यांना काही सुचना केल्या होत्या. त्यामुळे 27 परीक्षा केंद्रांवर इंग्रजीचा पेपर शांततेत पार पडला आहे, अशी माहिती केंद्र प्रमुखांनी दिली.
- परीक्षा केंद्रामध्ये कॉपीचे प्रकार घडू नयेत. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर अचानक जावून केंद्राची तपासणी करण्यासाठी शिक्षण मंडळाने भरारी पथके कार्यरत केली आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी भरारी पथकाची सतर्कता पनाला लागत आहे.