breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्रत्येकाने इतिहासातून बोध घेतला पाहिजे – अमरजीत पाटील
पिंपरी – महाराष्ट्र हा महापुरुषांचा, समाजाला दिशा देणा-या समाज सुधारकांचा आहे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. त्यामुळे आपण या महाराष्ट्राच्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अमरजीत पाटील यांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शनिवारी (दि. 23) चिंचवड येथील शाहुनगर पिरॅमिड हॉलमधील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, मुख्य समन्वयक शांताराम (बापू) कुंजीर, संघटक रमेशअण्णा हांडे आदीजण उपस्थित होते. पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकार्यांना निवडीचे पत्र यावेळी देण्यात आले.
अमरजीत पाटील यावेळी म्हणाले की, मेंदूच्या टिप-या उडाल्या पाहिजेत. ऐवढी ताकद ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवजयंती साजरी करणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांना यायचे नसल्यास, नको येवू द्यात. आम्ही तिथे शिवजयंती साजरी करू. इतिहासातून बोध घेतला पाहिजे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. आज लग्न सोहळ्यात मावळ्यांची पगडी घालून स्वागताला उभे केले जाते. समारंभात जेवण वाढतात. पण, ते वाढायचे असल्यास पुणेरी पगडी घालून वाढा. मावळ्यांचे हे होणारे विकृतीकरण थांबले पाहिजे. वाचत नाही, तोपर्यंत तुम्ही वाचत नाही.
तसेच राज्यात, देशात परस्थिती वाईट आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची हत्या झाली. 30 वर्षे उलटली, तरी पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा बसवू शकले नाहीत. सत्यशोधक समाजाचा विस्तार संभाजी ब्रिगेडने केला. पुरंदरेंना कितीही सन्मान देवू द्या. आपण छत्रपती शाहू महाराजांचे कर्तृत्त्व घरोघरी पोहचविले पाहिजे. सार्वजनिक विज्ञानाचा वापर झाला पाहिजे. उद्योगाच्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. अनेक क्षेत्रात बाहेरच्या देशात संधी आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटलांची विचारधारा पुढे चालविली पाहिजे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे यांनी केले. सूत्रसंचालन विजय बोत्रे तर सुधीर पुंडे यांनी आभार मानले.