पुण्यात रविवारी विजय दिवस रॅलीचे आयोजन
पुणे – पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने मिळवलेल्या विजयानिमित्त महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. १६) विजय दिवस रॅली व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने मोठा विजय मिळवला. या युद्धात ९१ हजार पाकिस्तानी सैनिकांनी विनाशर्त शरणागती पत्करली. त्याची जगातील सर्वात मोठी युद्ध शरणागती म्हणून जागतिक नोंद झाली आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या मोठ्या विजयाचा हा दिवस महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशनच्या वतीने एक सण म्हणून साजरा केला जातो.
त्यानुसार येत्या रविवारी सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर येथील इंजिनिअरिंग कॉलेज ते जंगली महाराज रस्तामार्गे पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहापर्यंत विजय दिवस रॅली काढण्यात येणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात दुपारी १२ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या नागरिकांचा विशेष सेवा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. विजय दिवस रॅलीमध्ये फाऊंडेशनचे सुमारे ७०० कमांडोज आणि कार्यकर्ते सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कर्नल गुलाबराव जाधव, कार्याध्यक्ष कर्नल जयंतराव चितळे, उपाध्यक्ष कर्नल विकास भदाणे, सल्लागार कर्नल सुरेश पाटील, प्रीतेश गुप्ते, सचिनकुमार मुथ्था, प्रदीप साळुंखे, मनोज साळवे, रुपेश जयस्वाल आदी उपस्थित असतील.