breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी पालिकेत ‘पाणी टंचाई’वरुन राजकारण तापलं ; विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक काढणार मोर्चा

भाजपच्या पार्टी बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा, अधिका-यांसह ठेकेदार बदलण्याची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात महापालिका पाणी पुरवठा अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शहरात सर्वत्र नागरिकांची सुरळीत व उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासह जनसंपर्क कार्यालयासमोर महिला, नागरिकांचा पाण्यासाठी बोंबाबोब सुरु आहे. याबाबत पाणी पुरवठा कार्यकारी अभियंते हे पदाधिकारी आणि नगरसेवकांना तीच ती उत्तरे देवून गोलगोल करीत आहेत. आयुक्तांना दिलेला आठ दिवसाची दिलेली डेडलाईन उलटूनही पाणी पुरवठ्यात काहीच सुधारणा नाही. त्यामुळे उद्या (दि.20) होणा-या महापालिका सर्वसाधारण सभेत पाण्यावरुन रणकंदन होणार आहे. तसेच विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक महापालिकेवर हंडा मोर्चा काढून आयुक्त श्रावण हर्डिकर यांना घेराव घालणार आहेत. दरम्यान, एेन सणासुदीत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आणि उच्च दाबाने न केल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेची उद्या ( दि.20) सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेत सत्तारुढ पक्षनेत्याच्या दालनात भाजपने पार्टी मिटींग घेतली. या बैठकीला महापाैर राहूल जाधव, उपमहापाैर सचिन चिंचवडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विधी सभापती माधुरी कुलकर्णी यासह विविध समित्याचे पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत भोसरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांनी कृत्रिम पाणी टंचाईवरुन नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलेली डेडलाईन संपलेली आहे. तरीही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणी पुरवठा अधिका-यांच्या नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना आॅक्टोबरमध्ये पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांच्या बदल्या करा, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच काहींनी पाणी टंचाईवरुन मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने तब्बल 15 हजाराहून अधिक नळजोड़णी बोगस झालेली आहे. त्यावर महासभेने धोरण बनवूनही पाणी पुरवठा विभागाने अधिकृत नळजोडणी अद्याप केलेली नाही. नागरिकांच्या नळजोडणीतून आणि पाण्याच्या पाईपमधून पाण्याची गळतीचे प्रमाण वाढलेले आहे. कित्येक आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये किमान एक ते दोन नळजोडणी अनधिकृतपणे केलेली आहे. अनधिकृत बांधकामाना पिण्याचे पाणी वापरले जात आहे.

दरम्यान, पवना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन शहरात सुरळीत व उच्च दाबाने पाणी पुरवठा करा, नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी वाढल्याने त्यावर तत्काळ नियोजन करायला हवे, संबंधित अधिकारी कामे करीत नसतील, त्यांच्याकडून योग्य नियोजन होत नसेल, तर त्याचा पदभार काढून त्या जागी अन्य अधिका-यांना संधी द्यायला हरकत नाही, असेही काही नगरसेवकांनी मागणी केली आहे.  महापालिका आयुक्त हे केवळ आश्वासन देत आहेत. पाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे उद्या होणा-या महासभेत पाण्यावरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आयुक्तासंह पाणी पुरवठा अधिका-यांना धारेवर धरणार असल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button