पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्मार्ट शाळां’साठी सत्ताधारी-विरोधकांचा ‘दिल्ली पॅर्टन फार्म्युला
शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वांचा भर, प्रायोगिक तत्वावर दहा शाळा निवडणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गंत शहरातील पाच शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. परंतू, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दाै-यानंतर महापालिका हद्दीतील किमान दहा शाळा प्रायोगिक तत्वावर सुधारण्यात याव्यात, त्या शाळा स्मार्ट व्हाव्यात, त्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारावी, याकरिता दिल्ली पॅर्टन राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापाैर राहूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. याकरिता दिल्ली महापालिकेशी सामजंस्य करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनचे सचिन चिखले उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिका-यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यानंतर दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर शाळांचा सुधारणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय गटनेत्यांनी घेतला आहे.
दिल्ली दौ-यावरून परतल्यानंतर महापौर जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी माहिती दिली. दिल्लीतील आम आदमी सरकारकडून 1148 आणि महापालिकेकडून 42 शाळांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता उंचावली आहे. दिल्ली महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजना व सुविधांची पाहणी या दौ-यात करण्यात आली. तेथील शाळेतील ई-लर्निग, स्मार्ट क्लास, वर्ग व्यवस्था व सुशोभिकरण, उद्यान, क्रीडांगण, ग्रंथालय व वाचनालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, शिक्षकांचा कक्ष वाखागण्याजोगे आहेत.
शाळेसंदर्भातील माहिती तेथील व्यवस्थापनाकडून घेण्यात आली. शिष्टमंडळासाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही करण्यात आले. शिष्टमंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शाळा व्यवस्थापक व अधिकार्यांनी उत्तरे दिली. दिल्लीतील शाळेच्या धर्तीवर शहरातील पालिका शाळा सुधारल्या जातील. आपण भौतिक व इतर सोयी-सुविधा चांगल्या पुरवित आहोत. शिक्षकांमध्ये व प्रशासनात काही तज्ज्ञांचा समावेश करून दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी दिल्ली पालिकेसोबत सामजंस्य करार करून त्यांचे काही शिक्षक आपल्याकडे व आपले शिक्षक त्यांच्या शाळेत पाठविले जातील. वेगवेगळे प्रयोग व सर्वांना एकत्र करून या सुधारणा घडवून आणल्या जातील, असे पदाधिका-यांनी सांगितले.