पाणी पुरवठा सुरळीत करा ; अन्यथा पालिकेसमोर उपोषण करणार – नगरसेविका मिनल यादव
पिंपरी – आकुर्डी, काळभोरनगर परिसरात कित्येक दिवसापासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा. अन्यथा, पालिकेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी दिला आहे.
यासंदर्भात मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, मोहननगर, आकुर्डी, दत्तवाडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे विस्कळीत आहे. लेखी किंवा तोंडी तक्रार दिल्यास काही दिवसांसाठी पाणीपुरवठा सुरळीत होतो. परंतु, पुन्हा काही दिवसातच ’जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने नागरिक विशेषत: महिला वर्ग त्रस्त आहे. सध्या एक वेळच पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असल्याने काही वेळातच पाणीपुरवठा बंद होतो. नोकरी करणा-या महिला वर्गाला तर आठवडाभराचे पाणी साठवून ठेवावे लागते. काही भागात तर नागरिकांना बाहेरून पाणी आणण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.