पाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे
- सुषमा स्वराज यांच्याकडून संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये जोरदार टीकास्त्र
संयुक्त राष्ट्र – पाकिस्तानकडून विदेशासाठीचे धोरण म्हणून दहशतवाद जोपासला जात आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा प्रसार करणे जराही सोडलेले नाही, अशा शब्दात विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या 73 व्या महासभेतील सर्वसाधारण चर्चेच्यावेळी पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दहशतवाद हा मानवतेसाठी असलेला धोका आहे, असेही स्वराज यांनी सांगितले.
न्यूयॉर्कवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यातील सूत्रधारांनाही त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली गेली. मात्र मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईद अजूनही पाकिस्तानमध्ये खुले आम फिरतो आहे. अन्य देशांविरोधात दहशतवादाचा फैलाव करण्याचे पाकिस्तानचे धोरण जराही बदललेले नाही. दहशतवादाबाबतचे ढोंगही कमी झालेले नाही, असेही स्वराज यांनी सांगितले.
आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान हवामान बदल आणि दहशतवादाचे आहे. 21 वे शतक आपल्या समवेत समान उद्दिष्टे, शांतता आणि समृद्धतेसाठीचे सहकार्य घेऊन येवो, अशी अपेक्षा आहे. मात्र न्यूयॉर्कवरील 9/11 हल्ला आणि मुंबईवरील 26/11 च्या आपत्तीने आमच्या स्वप्नांना उद्ध्वस्त केले आहे, असेही स्वराज म्हणाल्या.
जगातील “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ओसामा बिन लादेनला जगभर शोधले गेले पण तो पाकिस्तानातच सापडला. त्याला पाकिस्तानातच मारले गेले. मात्र काही घडलेच नाही, असे पाकिस्तान भासवत आहे. पाकिस्तानवर संपूर्ण जग विश्वास ठेवण्यास तयार नाही. पाकिस्तानमध्ये दहशतवादाला आर्थिक खतपाणी घातले जाते म्हणूनाअ “फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला वेठीस धरल्याचेही स्वराज म्हणाल्या.
दहशतवादाचा राक्षस सर्व जगाचा पाठलाग करतो आहे. काही ठिकाणी अधिक वेगाने तर काही ठिकाणी कमी वेगाने पण हा जीवघेणा पाठलाग सर्वत्र कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. आमच्या बाबतीत दहशतवादाची बीजे फार लांब नाहीत. आमच्या पश्चिमसीमेजवळच ही बीजे जोपासली जात आहेत. – सुषमा स्वराज, विदेश मंत्री