पाकिस्तानात बारा विद्यार्थिनींची हत्या
कराची – पाकिस्तानातील गिलगीट बाल्टीस्तान प्रांतातील चिलास गावातील एक शाळा इस्लामिक कट्टरपंथीय गनिमांनी उद्धवस्त करून तेथील बारा विद्यार्थिनींना ठार मारल्याची घटना घडली आहे. तेथील एकूण दोन शाळांच्या इमारतींवर हे हल्ले करण्यात आले तसेच त्या इमारतींमध्ये स्फोट करून त्या उद्धवस्त करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात तेथे बारा विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
हल्लेखोर नेमक्या कोणत्या गटाचे होते हे समजू शकले नाही. तथापी इस्लामिक कट्टरपंथीय गटांचा मुलींच्या शिक्षणाला विरोध असून मुलींच्या शाळांवर त्यांच्याकडून सातत्याने हल्ले होत आहेत. आत्ता पर्यंत अशा प्रकारे त्यांनी पंधराशे शाळा मागील काही काळात उद्धवस्त केल्या असल्याचे सांगण्यात येते. आज ज्या चिलास गावात ही घटना घडली ते गाव गिलगीट पासून 130 किमी अंतरावर डायमर जिल्ह्यात आहे.
या घटनेच्या विरोधात स्थानिक नागरीकांनी तेथे जोरदार निदर्शने केली. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पोलिसांना हल्लेखोरांना त्वरीत शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील एकूण नऊ शाळांपैकी आठ शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यात आली होती. त्या शाळा कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्या आहेत.