पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डबा लोकल
- २० डिसेंबपर्यंत लोकल मुंबईत दाखल; विरार-अंधेरीच्या प्रवाशांना दिलासा
पुढील आठवडय़ात चेन्नईहून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या दोन १२ डबा लोकलचे डबे सध्या धावणाऱ्या १२ डब्यांच्या गाडय़ांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या दोनने वाढून अंधेरी ते विरारदरम्यानच्या प्रवाशांना दिलासा मिळेल. या दोन गाडय़ा २० डिसेंबपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर डबे जोडण्याच्या कामाला सुरुवात होईल.
सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर १२ आणि १५ डब्यांच्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकल धावत आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या चार गाडय़ा तर मध्य रेल्वेवर एक १५ डबा गाडी चालविण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर या चार गाडय़ांच्या एकूण ५४ आणि मध्य रेल्वेवर एका गाडीच्या १२ फेऱ्या होतात.पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर या गाडय़ा चालवल्या जात आहेत. परंतु प्रवाशांची संख्या लक्षात घेता सर्वच गाडय़ा १५ डब्ब्यांच्या करण्याचा विचार आहे.
या दृष्टीने पश्चिम रेल्वेवरील दोन १२ डबा गाडय़ांना प्रत्येकी तीन-तीन डबे जोडले जातील. त्यामुळे १५ डबे गाडय़ांची संख्या सहावर जाईल. पश्चिम रेल्वेकडे डब्यांची कमतरता असल्याने रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यातून दोन १२ डबा गाडय़ा २० डिसेंबपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर या गाडय़ांचे तीन-तीन डबे काढून १२ डबा गाडय़ांना जोडले जाणार आहेत. परंतु दोन १५ डबा लोकल नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते.
सध्या फक्त जलद मार्गावर
नव्या १५ डब्यांच्या गाडय़ा चर्चगेट ते विरार मार्गावरच जलद गाडय़ा म्हणून धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा ते १२ फेऱ्यांची भर पडेल. चेन्नईतून येणाऱ्या दोन १२ डब्यांच्या लोकलचे तीन-तीन डबे काढल्यानंतर उर्वरित डब्यांचे काय करायचे, याचा निर्णय नंतर घेतला जाईल.
दोन १२ डबा गाडय़ा चेन्नईहून मुंबईत येतील. त्याचे डबे काढून १२ डबा लोकल गाडय़ांना जोडले जाणार आहेत. त्यानुसार सहा १५ डबा लोकल चालवण्याचे नियोजन केले जात आहे.
– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे