पवना नदीपात्रात लाखो माशांचा मृत्यू, माशांच्या मृत्यूस कारणीभूत कोण?
पिंपरी – थेरगाव येथील पवना नदीच्या केजूबाई बंधा-याच्या पात्रातील लाखो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सामाजिक संस्थांमुळे हा प्रकार उघडकीस आणला आहे. माशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैलाचे पाणी सर्रास सोडलं जात आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुनही पवना नदी पत्रातील जलपर्णी ‘जैसे थे’च आहे. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जलपर्णी काढली, मात्र महानगर पालिका याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
केजुबाई येथील बंधा-यात मृत्यू झालेल्या माशांचा खच पडला असून त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पाण्याचे आणि मातीचे नमुने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
‘पाण्याचे नमुने घेतले आहेत.त्याचा अहवाल काय येईल ते पाहू, अचानक अशी घटना घडत नाही. गेल्या प्रकरणात प्रदुषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना नोटिसा पाठवल्या होत्या. पण म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होते.’, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.