पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग
पिंपरी – पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २१ आॅगस्ट) सकाळी साडेआठ वाजल्यापासून धरणातून ४७८५ क्युसेकने पाणी पवना नदीत सोडण्यात आले आहे. विसर्गामुळे नदीपात्राला पुर आला असून शिवली येळसे रस्ता व पुल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने नदीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने देखील याबाबत नागरिकांना सुचना द्याव्यात असे कळविण्यात आले आहे.
मावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. या धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, कालपासून पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने आज सकाळी साडेआठ वाजता विसर्गात वाढ करत ४७८५ क्युसेक करण्यात आला , अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी सांगितले.