पत्रकारांच्या हकालपट्टीचा विषय लोकसभेतही गाजला
नवी दिल्ली – सरकारच्या दबावामुळे विविध वाहिन्यांवरील वरीष्ठ पत्रकारांची हकालपट्टी केली जात असून प्रसार माध्यमांवर सरकार दहशतनिर्माण करीत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फेही लोकसभेत करण्यात आला.
मल्लिकार्जून खरगे यांनी ज्या वाहिनीवरील पत्रकारांना नोकरी सोडावी लागली आहे त्यांची नावे सभागृहात सादर करून सरकारकडून पत्रकारांची आणि माध्यमांची मुस्काटदाबी सुरू असल्याचा आरोप केला. एका वाहिनीवर चौदा वर्ष काम करणाऱ्या एका वरीष्ठ पत्रकाराला आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांना सरकारच्या दाव्यांची पोलखोल केल्याच्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आल्याचा आरोप खरगे यांनी केला. माध्यमांना धमकावले जात असून सरकारच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या किंवा प्रसारीत करणाऱ्या संपादकांना त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्याचे सत्र सध्या सुरू झाले आहे असा आरोपही त्यांनी केला.
घटनेने प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे पण त्या स्वातंत्र्यावरच सरकार घाला घालत आहे असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांनी सरकारच्या हस्तक्षेपाच्या आरोपाचा इन्कार केला. ते म्हणाले की सरकारने कोणत्याही प्रसार माध्यम संस्थेला खोटी किंवा सरकार विरोधी बातमी दिल्याच्या कारणावरून नोटीस दिलेली नाहीं. ज्या दोन वरीष्ठ पत्रकारांचा विषय खरगे यांनी उपस्थित केला आहे त्यांना चॅनेलचा टीआरपी कमी झाल्यामुळे नोकरीवरून जावे लागले आहे त्याच्याशी सरकारचा संबंध नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.