पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केरळला 500 कोटींची मदत
तिरुवनंतपुरम – केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची मदत जाहीर केली. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.
तर स्टेच बँकेनेही केरळवासियांना दिलासा दिला असून दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. तसेच बँक आॅफ केरळच्या खातेदारांना सेवा शुल्क आणि इतर दंड माफ करण्यात येणार आहे.
तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपल्या सद्भावना केरळवासियांसोबत असल्याचे म्हटले आहे. केवळ शब्दांनी सांत्वन करणे पुरेसे नाही. केरळच्या बंधुभगिनींसाठी आम्ही प्रार्थना करतोय. महापुराशी लढणाऱ्या केरळवासियांना ताकद मिळो, अशा शब्दांत ममता यांनी दुख: व्यक्त केले आहे.
तर जेएनयु विद्यार्थी संघटनेने आज सकाळी गृहमंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जाणूनबुजुन केरळच्या पुरग्रस्तांना मदत करण्यास वेळ लावत असल्याचा आरोप केला आहे.