नेहरुंच्या जॅकेटवर गुलाब असायचं, पण कधी शेतकऱ्यांचं दु:ख दिसलं नाही – नरेंद्र मोदी
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाकडून वारंवार होणाऱ्या ‘कामदार-नामदार’ टीकेला उत्तर दिलं आहे. याआधी काँग्रेसने नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाबद्दल किती माहिती आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावेळी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतीची बिकट अवस्था असण्याला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु जबाबदार असल्याची टीका केली.
जवाहरलाल नेहरु यांचं नाव न घेता मोदींनी म्हटलं की, एक नेता नेहमी गुलाब वापरायचा आणि त्यांना बागकामाची चांगली माहिती होती, पण शेतीतलं काहीच माहिती नव्हतं. शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे त्यासाठी हीच गोष्ट जबाबदार आहे. ‘ते नेहमी (नेहरु) गुलाब वापरायचे आणि बागकामाची माहिती होती. पण शेतकरी किंवी शेतीबद्दल काहीच माहिती नव्हतं यामुळे आज शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
यावेळी नरेंद्र मोदींनी दावा केला की, माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिरासाठी अभिषेक करण्यासाठी येत असता नेहरुंनी त्यांना विरोध केला होता. मंदिराचं परदेशी आक्रमणकर्त्यांनी नुकसान केलं होतं, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी दुरुस्ती करत मंदीर नव्याने उभं केलं होतं.
यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना आपण कधीही हिंदुत्त्वाची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला नसल्याचं म्हटलं. पण आपल्याला बोलण्याचा हक्क आहे असं ते म्हणाले आहेत. धर्मावर इतकी माहिती असणाऱ्या काँग्रेसच्या माहिती स्त्रोत कोणता आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.