निवडणूका अनेक पाहिल्या; पण सत्तेचा इतका गैरवापर पाहिलेला नाही
- शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान
मुंबई – पोटनिवडणुकीच्या काळात शनिवार, रविवारीसुद्धा बॅंका सुरू ठेवा असे आदेश काढणे आणि या दोन दिवसांत पैशाचे वाटप करण्यास सांगणे याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठल्याही मार्गाने निवडणूक जिंकायचा हा मुख्यमंत्र्यांचा मानस होता. साम, दाम, दंड, भेद याची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे. निवडणुका अनेक बघितल्या पण सत्तेचा इतका गैरवापर मी कधीही बघितला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले.
सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पालघर येथील पोटनिवडणुकीत भाजपकडून झालेल्या गैरप्रकारांचा समाचार घेतला. पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितले त्या साम, दाम, दंड, भेद याची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे. पालघरमध्ये जरी भाजपचा विजय झाला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळालेल्या मतांची संख्या, त्याचप्रमाणे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला मिळालेल्या मतांची संख्या पाहता, कितीतरी मोठा वर्ग भाजपच्या विरोधात आहे हे स्पष्ट होत असल्याचे शरद पवार म्हणाले.
निवडणूक यंत्रणांनी मर्यादा सोडू नये!
भंडारा-गोंदियात झालेल्या प्रकारानंतर तेथील जिल्हाधिकाऱ्यांना पुढील दहा वर्षं कोणतीही निवडणूक जबाबदारी न देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. हा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घ्यायला हवा. ज्याची जरब अन्य अधिकाऱ्यांना बसेल. निवडणूक यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा मर्यादा सोडून वागता कामा नये याबद्दलची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले.
भाजपच्या परभवामुळे वेगळे चित्र निर्माण होईल
देशामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये 10 पैकी 9 ठिकाणी सत्ताधारी पक्ष हरतोय ही लहान गोष्ट नाही. 1977 साली असाच एकदा एकेक पराभव व्हायला सुरुवात झाली आणि सरकार गेल्याचं चित्र पहायला मिळालं. याआधीही एक-दोनदा पोटनिवडणुकीत त्यावेळचा सत्ताधारी पक्ष हरला आणि नंतरच्या निवडणुकांत वेगळे चित्र पहायला मिळाले. आज तेच चित्र पुन्हा देशात दिसण्याची एकंदरीत स्थिती आहे, असे भाकीत शरद पवार यांनी केले.