निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पिंपरी-चिंचवड जनतेची फसवणूक
- राष्ट्रवादी काॅंग्रेसचा शास्तीकर, अनधिकृत बांधकाम प्रश्नावरुन आरोप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सत्ता द्या, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, संपुर्ण शास्तीकरांचा प्रश्न सोडविता, असे आश्वासन दिले होते. परंतू, आजही अनधिकृत बांधकामे आणि सरसकट शास्तीकरातून जनतेची सुटका झालेली नाही. आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक हजार चाैरस फुटापर्यंत शास्तीकर माफ झाल्याचे सांगितले आहे. परंतू, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने त्याच्या अमंलबजावणीबाबत शंका आहे. त्यामुळे सरसकट शास्तीकर माफीचा निर्णय न घेता, भाजपने पुन्हा एकदा फसव्या आश्वासनाचे गाजर दाखविल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला. असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रशांत शितोळे म्हणाले, अनधिकृत बांधकामाचा संपुर्ण शास्तीकर माफ करावा, अशी पिंपरी-चिंचवडकर नागरिकांसह आमचीही मागणी आहे. तसे न करता भाजपने एक हजार चाैरस फुटापर्यंत माफीचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेवून त्याची अमंलबजावणी होणे शंकास्पद आहे. त्याशिवाय हा आदेश काढल्याच्या दिनांकापासून निर्णय लागू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ होणार का? हा सुध्दा प्रश्न आहे.
भाजपचे नेते म्हणतात हे पाप राष्ट्रवादी-काॅंग्रेसचे आहे, पण आम्ही म्हणतो. गोरगरीबांनी काबाडकष्टांतून ही घरे बांधली आहेत. त्यांनी बांधलेल्या घरांना तुम्ही पाप कसे काय म्हणता, तसेच तुम्हाला हा प्रश्न सोडवून पुण्य करायची संधी दिली, ती संधी तुम्ही घेतली नाही. त्यामुळे लोकांचा भाजपवर व स्थानिक नेत्यावर भरवसा राहिला नाही. किती वेळा, लोकांना फसविणार तुम्ही, बाहेर जावून पेढे वाटायचे, फ्लेक्स लावायचे, आता हत्तीवरुन पेढे वाटा मग, नाही तर स्वताःचे बडवून घ्यावे लागेल तुम्हाला.
मुळात भाजपला मागील साडेचार वर्षात हा निर्णय घेतला नाही. दोन दिवसात आचारसंहिता लागणार असून या निर्णयाची लगेच अमंलबजावणी होणार कशी, हा प्रश्नच आहे. शास्तीकराबाबत दिलेल्या आदेशात कुठेही ‘पूर्वलक्षी’ प्रभावाने माफ असा उल्लेख केला नाही. खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने खोटे सांगून जनतेची फसवणूक केली जात आहे. मालमत्ता धारकांना आजपर्यंतचा शास्तीकर भरावा लागणार असून पुन्हा एकादा नव्याने गाजर दाखविले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार नाही”
संजोग वाघेरे म्हणाले, ”निवडणुकीवेळी 100 टक्के शास्तीकर माफ करु अशा घोषणा भाजपच्या नेत्यांनी केला होत्या. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. अगोदर 500 चौरस फुटापर्यंतच्या आणि आता 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकाचा शास्तीकर माफ केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सरसकट शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे काय झाले? ” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.