निवडणुकांच्या तोंडावरच राम मंदिराचा मुद्दा का?-राज ठाकरे
पुणे – लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा भाजपाने पुन्हा समोर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी सांगितले की निवडणुका होण्यापूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी पावले उचलू. चार वर्षात तुम्हाला आज राम मंदिर आठवले का? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. मनसेचा पदाधिकारी मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. राम मंदिर बांधले गेले पाहिजे का? निश्चितपणे बांधले गेले पाहिजे पण निवडणुका झाल्यावर असे माझे स्पष्ट मत असल्याचेही राज ठाकरेंनी बोलून दाखवले.
सत्तेवर आल्या आल्याच खरे तर या सरकारने मंदिर बांधायला हवे होते. जय श्रीरामच्या विटांचे काय झाले? सगळ्यांकडून पैसै घेतले विटा घेऊन गेले, गंगाजळ वाटण्यात आले होते. त्या सगळ्याचे काय झाले? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. देशात प्रगती काय झाली, विकास काय झाला ते सोयीस्करपणे लपवायचे आणि हा राम मंदिराचा विषय समोर आणायचा. म्हणजे काय झाले ते विचारायला कोणी येणारच नाही. जातीय दंगलीत जनतेला गुंतवायचे हा यामागचा डाव आहे. तुमचे घर उभे राहावे, संसार उभा राहावा म्हणून कोणीही करताना दिसत नाही असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तुमच्या भावनांशी खेळायचे, त्याचे राजकारण करायचे आणि तुमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारचे धोरण आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.