नक्षल समर्थकांचा सरकार उलथवण्याचा कट!
पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा
मुंबई : दलित तरुणांना हाताशी धरून सरकार उलथवून टाकण्याचा शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या विचारवंताचा कट होता, असा दावा पुणे पोलिसांनी बुधवारी वर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्या जामिनाला विरोध करताना केला. सरकार उलथवून टाकण्याचा नक्षलवाद्यांचा हेतू आहे. तो हेतू पूर्ण करण्यासाठी हे विचारवंत दलित तरुणांना हाताशी धरत असल्याचा दावाही पोलिसांनी केला.
फरेरा आणि गोन्साल्विस यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून फरेरा यांच्या जामिनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दाखल केले. फरेरा यांच्यासह अटक केलेले विचारवंत हे बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) ज्येष्ठ सदस्य आहेत आणि सरकार उलथवून लावण्याच्या पक्षाच्या हेतूसाठी आग्रही आहेत. पक्षाचा हा हेतू साध्य करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ते मोठय़ा संख्येने आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या लोकांचा वापर करत आहेत. दलित समाजाला त्यांनी त्यासाठी हाताशी धरले असून त्यांच्यावर आजही कशा प्रकारे अत्याचार होत आहे हे दाखवून देण्याकरिता या विचारवंतांकडून सभा आयोजित केल्या जात आहेत. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेतही फरेरा आणि अटकेत असलेल्या अन्य विचारवंतांनी चिथावणीखोर भाषणे दिली. त्यानंतर हिंसाचार झाला होता. या समाजामध्ये सरकारप्रति द्वेष निर्माण करून त्याद्वारे सरकार उलथवून लावण्याचा या विचारवतांचा कट असल्याचा आरोपही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.