धमकीचे पत्र आल्याचे सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न – शरद पवार
पुणे – पुण्यात एल्गार परिषद भरविणाऱ्यांना नक्षलवादी ठरविले जाते. कोरेगाव-भीमा येथे कोणी कृत्य केले हे सगळ्यांना माहिती आहे. धमकीचे पत्र आल्यानंतर वर्तमानपत्रांना सांगत नाहीत, ते पहिले पोलिसांना सांगतात. अशी पत्र आल्याचे सांगून लोकांकडून सहानुभुती मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा होत आहे. या सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी पवार यांनी यापुढे महात्मा फुले यांची पगडी घालून सत्कार करण्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, 10 जून 1999 ला मेळावा घेऊन राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळी जे अध्यक्ष होते आज तेच छगन भुजबळ आपल्यामध्ये मुक्तपणाने बोलण्यास आपणात आहेत. न्यायदेवतेकडून त्यांची दखल घेतली जाईल आणि त्यांच्याकडून पुन्हा जनतेची सेवा केली जाईल. महाराष्ट्र सदन भुजबळांच्या नजरेतून, ही वास्तू पंतप्रधानांना आवडते ही भुजबळांना पावती आहे. आज सर्व विरोधी पक्षांची एकाच व्यासपीठावर येण्याची मानसिकता आहे. भाजप व्यतिरिक्त पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी आम्ही निर्णय घेतले. आजही नेपाळमध्ये जुने चलन बदलून मिळत आहे. आपल्या देशात फक्त गरिबांसाठी नोटाबंदी झाली. देशातील जनतेच्या मनात काय आहे हे गोंदिया-भंडाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिले आहे. याठिकाणी मतदान यंत्रात गडबड झाल्याच्या घटना घडल्या. तरीही येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला.