देशावर 200 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखरेचं संकट!
कोल्हापूर – सध्या भारतात 200 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त उत्पादित होत असल्याने भारतासमोर भले मोठ साखर संकट निर्माण होणार आहे. या संकटावर मात करण्यासाठी साखरेपासून इथेनॉल निर्माण करण्याचा पर्याय वापरला नाही तर देशातील साखर उद्योग प्रचंड अडचणीत येणार आहे.
साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला जरी माग टाकले असले तरी आपल्या देशावर अतिरिक्त साखरेचे भले मोठ संकट उभे राहिलेले आहे. कृषि प्रधान देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. भारतात सर्वाधिक पीक उसाचे घेतल जाते. उसापासून साखर निर्मिती करणारे सहकारी तत्वांवरील 101 आणि खाजगी 86 असे 187 साखर कारखाने राज्यात आहेत. तर देशात 516 साखर कारखाने कार्यरत आहेत.
गेल्या काही वर्षात भारतात साखरेचं विक्रमी उत्पादन होत आहे. त्यामुळे भारत हा साखर निर्यात करणारा देश म्हणून जगात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन देशात झाले होते. यावर्षी 350 लाख मेट्रिक टन साखर उत्पादीत होणार आहे. त्यातच गेल्या वर्षी देखील जवळपास 100 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. तर भारताची साखरेची गरज 250 लाख मेट्रिक टन आहे. त्यामुळे देशासमोर 200 लाख मॅट्रिक टन अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून अतिरिक्त साखरे मार्फत इथेनॉलचे उत्पादन करून ब्राझील प्रमाणे वाटचाल करणे गरजेचे असल्याचे साखर तज्ज्ञांचे मत आहे.
अतिरिक्त साखरेचं नियोजन करण्यात केंद्र सरकार कमी पडत आहे. दिल्लीतील कृषी भवनात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना देशातील ऊस शेतीबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यामुळं स्वतःची आद्ययवत यंत्रणा न वापरता खाजगी संस्थेकडून मिळलेल्या माहितीवर साखरेचं नियोजन चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. देशातील अतिरिक्त साखरेचं योग्य नियोजन झालं आणि इथेनॉल सारखा पर्याय आला तर परकीय चलन वाचवण्या बरोबर अनेक चांगल्या गोष्टी देशात घडू शकतात अस राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने सध्या इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिलं असलं तरी खाजगी पेट्रोलियम कंपन्यांकडून योग्य प्रतिसाद दिसत नाही. जर इथोनॉल सारखा पर्याय उभा राहिला तर ऐरणीवर असणारा प्रदूषणाचा मुद्दा निकालात निघेल, आयात होणाऱ्या इंधनाचा खर्च वाचेल यांसह अनेक हिताचे पर्याय उभे राहणार आहेत.
ब्राझीलचा आदर्श घेऊन भारताने सुद्धा आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या साखरेचं नियोजन केले तर शिल्लक राहणाऱ्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न नक्कीच सुटेल.