दिव्यांग मित्र अभियानामुळे दिव्यांगांना मोठा आधार; आमदार शिवाजीराव नाईक यांचे प्रतिपादन
शिराळा (प्रतिनिधी) – दिव्यांग मित्र अभियानामुळे राज्यात सांगली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने व ए.एल.आय.एम.सी.ओ. या सेवाभावी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग मित्र अभियानामुळे सांगली जिल्ह्यातील अंध, मुकबधीर, कर्णबधीर व अस्थीव्यंग दिव्यांगाना मोठा आधार मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेर्ले ता. वाळवा येथे जिल्हा परिषद सांगली व ए.एल.आय.एम.सी.ओ. या सेवाभावी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग मित्र अभियानाचे उदघाटन आमदार नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
नाईक म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील सामान्य तसेच गोर गरीब कुटुंबातील एकूण १ हजार १४० दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून त्यापैकी ८६० पात्र लाभार्थ्यांना ए.एल.आय.एम.सी.ओ. या सेवाभावी संस्थेमार्फत विविध कृत्रिम उपकरणे व साहित्य वाटप करण्यात येत आहे. यामध्ये कृत्रिम हात, पाय, अंधासाठी काठी, श्रवण यंत्र, मोबाईल क्यालीपर्स, कुबड्या, तीनचाकी सायकल तसेच इतर आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानाचा जास्तीत जास्त दिव्यांगजनांची लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार मानसिंगराव नाईक, गट विकास अधिकारी बागल, जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, तालुका आरोग्य अधिकारी, सचिन पाटील, हणमंत कुंभार, संजय पाटील आदींनी या अभियानास भेट दिली.