दहशतवादाला न जुमानता अमरनाथ यात्रेला सुरूवात
जम्मू-काश्मीर : हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली. या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये 1554 पुरुष, 320 महिला आणि 30 मुले आहेत.
आज सकाळी जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीवीआर सुब्रमण्यम, जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि बीबी व्यास यांनी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविला. यात्रेकरु आज दिवसभर काश्मीर येथील गांदेरबालस्थित बालटाल आणि अनंतनागमधील नुनवान, पहलगाम कॅम्पपर्यंत पोहचणार आहेत. त्यानंतर दुस-या दिवशी पुढील प्रवास करणार आहेत. ही यात्रेची 26 ऑगस्टला संपणार आहे. त्यादिवशी रक्षाबंधन सुद्धा आहे.
अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे त्यामुळे महामार्गावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. प्रथमच सुरक्षेसाठी महिला सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेसाठी यात्रा मार्गावर सुरक्षा रक्षकांशिवाय ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, भाविकांना लष्कराचा घेरा काश्मीरपासून अमरनाथ गुहेपर्यंत असणार आहे.