थंडी पुन्हा अवतरली!
राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश निर्माण झाल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने शनिवारी राज्यात पुन्हा थंडी अवतरली. शेवटच्या टप्प्यातील ही थंडी मात्र अल्पकाळच राहणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात गारवा राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत राज्याच्या बहुतांश भागात कोकडे हवामान आणि निरभ्र आकाश आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्रातील पुण्यामध्ये किमान तापमान १०.३ अंश, नाशिकमध्ये ९.४ अंश, तर नगरमध्ये तापमान १०.२ आहे. त्यामुळे या ठिकाणी गारवा जाणवतो आहे. महाबळेश्वर, सातारा, जळगाव आदी ठिकाणी १२ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान आहे.
पावसाची शक्यता कायम
राजस्थान आणि परिसरावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मालदीव बेटांपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती असल्याने पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. २० फेब्रुवारीला विदर्भासह मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.