तेजस्वी यादव यांचाही सरकार स्थापनेसाठी दावा
पाटणा – विरोधी आघाडीकडे बहुमत असतानाही कर्नाटकात राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला सरकार बनवण्यासाठी प्रथम संधी दिली त्याच आधारावर आम्हालाही बिहार मध्ये सरकार स्थापनेसाठी संधी द्या अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाने तेथील राज्यपालांकडे केली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आज कॉंग्रेस व अन्य राजकीय पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल सत्त्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करून भाजपपुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तेजस्वी यादव यांनी राज्यपालांना सांगितले की आमचा पक्ष हा बिहार विधानसभेत सिंगल लार्जेस्ट पक्ष आहे. आणि आमची कॉंग्रेसबरोबर निवडणूकपुर्व आघाडी झाली होती त्यामुळे आमची आघाडीही सर्वात मोठी आघाडी आहे त्यामुळे आम्हाला कर्नाटकातील निर्णयानुसार सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे असे त्यांनी राज्यपालांना सांगितले. आम्हाला 111 आमदारांचा पाठिंबा आहे असे आम्ही राज्यपालांना सांगितले आहे असे तेजस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले सरकार स्थापन करण्याची संधी कोणाला द्यायची याबाबत एकाच देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे निकष असू शकत नाहीत.
जर कर्नाटकात सिंगल लार्जेस्ट पार्टी या तत्वाने एखाद्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी दिली जात असेल तर त्याच न्यायाने आम्हालाही येथे ही संधी मिळायला हवी असे ते म्हणाले. 243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेत राजदकडे 80 आमदार आहेत. त्यांनी जेडीयुु बरोबर महाआघाडी केली होती त्यात जेडीयुला 71 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला केवळ 53 जागा आहेत. राजद आणि जेडीयु बरोबरचे संबंध संपुष्ठात आल्यानंतर जेडीयुने भाजपबरोबर बिहार मध्ये सरकार स्थापन केले आहे.