…तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेना- भाजपातही प्रवेश मिळाला नसता: धनंजय मुंडे
बीड – जयदत्त क्षीरसागरांनी पक्ष बदलण्यासाठी आजचाच मुहूर्त निवडला, कारण उद्याच्या निकालामध्ये बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आघाडी मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोणत्याच पक्षाने प्रवेश दिला नसता म्हणूनच त्यांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला असावा, चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या या निर्णयाचे अजिबात आर्श्चय वाटत नाही , कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपा उमेदवाराचा प्रचार केला होता असे मुंडे म्हणाले.
कोण आहेत क्षीरसागर ?
बीड जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी प्रस्थापितांचे वर्चस्व कमी करून आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिक्षण व सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात हक्काचा माणूस तयार करून प्रभाव निर्माण केला. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात क्षीरसागरांनी निर्णायक राजकीय ताकद निर्माण केली होती. २० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात यावे यासाठी शरद पवार यांना स्वत: क्षीरसागरांच्या घरी धाव घ्यावी लागली होती.