… तर अधिका-यांसह पदाधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेन – रामदास कदम
पिंपरी – इंद्रायणी नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडणा-या कारखान्यांवर कारवाई करत नसाल, तर तुम्ही महापालिका चालविण्यास लायक नाही. पिंपरी महापालिकेसह लोणावळा, तळेगाव नगरपालिका हद्दीतूनही सांडपाणी सोडले जात आहे. हे सांडपाणी तत्काळ न थांबविल्यास अधिकारी व पदाधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा विनाजामिन गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच तुमच्या अटकेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.
पर्यावरण मंत्री रामदास कदम आज (रविवारी) आळंदीतील शासकिय विश्रामगृहात इंद्रायणी प्रदुषणाबाबत आणि एसटीपी प्लँटबाबत पिंपरी महापालिका, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगल, आमदार सुरेश गोरे, प्रदुषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी एच.डी.गंधे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे आदी उपस्थीत होते.
यावेळी कदम म्हणाले, आळंदीत येणा-या लाखो भाविकांसह पुढील गावांना प्रदुषित पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत लेखी तक्रारी अर्ज आणि निवेदने दिले. आजपासून नदीपात्रात प्रदुषित पाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तुम्ही जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज बाळगा. नदीमध्ये चौदा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जाते.
याप्रसंगी जादाचा एसटीपी प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. पण प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याची माहिती यावेळी पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण अष्टेकर यांनी दिली. यावेळी मंत्री कदम संतप्त झाले आणि तुम्ही महापालिका चालविण्यास नालायक आहात. कारखान्यांवर कारवाई करण्यास तुमचे हात बांधलेत का. कारवाई करण्यात अडचण काय. मी दोन दिवस थांबू का. लोकांनी तुमचे चौदा एमएलडी सांडपाणी प्यायचे का अशा शब्दात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत झापले. त्यानंतर सहा महिन्याची मुदत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी महापालिकेला दिली. पण त्याआधी सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही याची तत्काळ दक्षता घेण्याच्याही आदेश दिला.
इंद्रायणी प्रदुषण करणाऱ्या पिंपरी महापालिका, लोणावळा, तळेगाव पालिका आणि देहू ग्रामपंचायतीच्या अधिका-यांची बैठक मंगळवारी (ता.३) मंत्रालयात ठेवण्यात आली आहे. बैठकीला येताना एसटीपी, घनकचरा व्यवस्थापन आणि त्यावरील कारवाईबाबतची संपूर्ण माहिती घेवून येण्यास सांगितले. तर आषाढी वारीत पावसापासून संरक्षण करण्यासाठी वारकरी अंगावर घोंगटे म्हणून घेण्यात येणारे प्लॅस्टिकचे कापडाच्या वापरास बंदी नसुन त्याबाबत शिथीलता दिली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.