तनुश्रीला बॉलीवूडचे समर्थन प्रामाणिक की सवंग?
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर संपूर्ण बॉलीवूड ढवळून निघाले आहे. पूर्वी करण-कंगणा, हृतिक-कंगणा यांचे वाद झाले होते. पण ते वैयक्तिक वाद अशाप्रकारे सार्वजनिक झाले नव्हते. पहिल्यांदाच एखाद्या ऍक्ट्रेसने कोणा अॅक्टरबाबत थेटपणे सवंग आरोप केल्यामुळे या विषयाला आता सार्वजनिक
चर्चेचे स्वरूप प्राप्त व्हायला लागले आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि बॉलीवूडमध्ये “कास्टिंग काऊच’ची प्राथमिक फेरी आकाराला येते आहे की काय असे वाटावे, इतक्या टोकाला जाऊन आता सर्वच कलाकार मंडळींनी या वादामध्ये उडी घ्यायला सुरुवात केली आहे.
प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी तनुश्रीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यातील बहुतेकांनी तनुश्रीच्या आरोपांना अगोदर समजून तरी घ्यायला हवे. असा सूर कायम ठेवला आहे. यातील कोणीही नानावरच्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असा दावा केल्याचे आढळत नाही. कोणीही नानाचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला नाही. राखी सावंतनेही हे ध्यानात घ्यायला हवे. तर फराह खान, गणेश आचार्य यांनी नानाची बाजू घेतली आहे.
बॉलीवूडमध्ये “मी टू’ ही मुव्हमेंट सुरू व्हायला लागल्याची ही सर्व लक्षणे आहेत. हॉलीवूड आणि विदेशातील विशेषतः अमेरिकेतील राजकीय वर्तुळामध्ये वरची पोस्ट मिळवण्यासाठी महिलांकडे “सेवेची’ मागणी केली जायची. या प्रकाराला बळी पडलेल्यांनी सुरू केलेली “मी टू’ही मुव्हमेंट बॉलीवूडमध्ये करावी लागणार नाही. मात्र तसा अनुभव नसेलच असेही नाही. नानासारख्या ऍक्टरला अशा आरोपांना सामोरे जावे लागते ही बाब मात्र नवीन आहे.
अमिताभ बच्चन यांनी मात्र या विषयापासून स्वतःला दूर ठेवले आहे. माझे नाव तनुश्रीही नाही आणि नाना पाटेकरही नाही. मग या विषयावर मी मत कसे व्यक्त करू ? असे बच्चन यांनी म्हटले आहे. सवंग लोकप्रियतेपासून दूर राहण्याचे हे धोरण इतर सेलिब्रिटी कधी स्वीकारणार?