जन्मठेपेची शिक्षा कमी करा, आसाराम बापूची राज्यपालांकडे दया याचिका
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने राजस्थानच्या राज्यपालांकडे दया याचिका केली आहे. याचिकेत आसाराम बापूने शिक्षा कमी करण्याची विनंती केली आहे. आसाराम बापूने आपल्या वयाचा दाखला देत तसंच थकवा आणणाऱ्या या शिक्षेतून सुटका व्हावी असं याचिकेत म्हटलं आहे.
25 एप्रिल रोजी आसाराम बापूला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. पाच वर्षांपूवी आपल्याच एका आश्रमात आसाराम बापूने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आसाराम बापूने शिक्षेविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अद्याप याचिकेवर सुनावणी झालेली नाही.
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी याचिका गृह विभागाकडे पाठवली असून सविस्तर अहवाल मागवला आहे. गृह विभागाने ही याचिका जोधपूर केंद्रीय कारागृह विभागाकडे पाठवली असून कारागृह विभागाने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
‘आम्हाला आसाराम बापूची दया याचिका मिळाली आहे. आम्ही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अहवाल मागवला आहे’, असं जोधपूर केंद्रीय कारागृहाचे अधिक्षक कैलाश त्रिवेदी यांनी सांगितलं आहे. अहवाल मिळाल्यानंतर कारागृह प्रशासन महासंचालकांसमोर (कारागृह) तो सादर करेल.