breaking-newsमहाराष्ट्र
जनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख
मुंबई- भाजपाचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकिचा राजीनामा दिल्यानंतर आज सरकारवर हल्लाबोल केला. जनतेची कोणतीही कामे ना केंद्र सरकारने केली ना राज्य सरकारने केली. समाजातील सर्वच थरांतील जनतेच्या मनात या सरकारबाबत रोष आहे. यामुळेच आपणही नाराज होतो. माझ्यासारखीच नाराजी भाजपामधील काही आमदारांच्या मनात आहे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. राज्यातील फडणवीस सरकार हे नपुंसक व वांझोटे असून या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सत्ताधारी दोन्ही पक्षांच्या आमदारांना आवाहन करणारे पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे काटोल विधानसभा मतदारसंघाचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी 2 ऑक्टोबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनतर आज त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. आपण राजीनामा देण्याआधी वा दिल्यानंतर भाजपाच्या कुठल्याही नेत्याने आपल्याशी संपर्क साधला नसल्याची खंत बोलून दाखवतानाच काटोल विधानसभा मतदारसंघात तातडीने पोटनिवडणूक घेण्यात यावी व भाजपाने तिथे आपला उमेदवार निवडून आणून दाखवावा, असे आव्हान दिले.
राष्ट्रीय राजकारणात जाण्याचे संकेत आपण आता विधानसभा लढणार नसून राष्ट्रीय राजकारणात जाण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट करताना कॉंग्रेसमध्येच प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भाजपामध्ये आपल्यासारखेच अनेक नाराज आमदार असून मंत्रीमंडळ विस्तारानंतर या नाराजीचा स्फोट होउन ते राजीनामे देतील, असा दावाही देशमुख यांनी केला.