चौकीदार चोरच आहे : न्यायालयाच्या निकालानंतरही राहुल गांधीचा हल्लाबोल
नवी दिल्ली : राफेल खरेदी व्यवहारावरून सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट देऊन ७-८ तास होतात न होतात तोच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चौकीदार चोरच आहे, मोदींनी ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले, याचा राहुल यांनी पुनरुच्चार केला.
न्यायालय आपल्या कार्यकक्षेत निर्णय देते. राफेल विमानाची किंमत कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. कॅगचा अहवाल लोकलेखा समितीसमोर मांडण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र कॅगचा कोणताही अहवाल लोक लेखा समितीसमोर आलेलाच नाही. लोकलेखा समिती असा अहवाल संसदेत मांडते आणि नंतर तो सार्वजनिक होतो. असा कोणताही अहवाल लोक लेखा समितीसमोर आलेला नाही तर तो न्यायालयात कसा गेला? सरकारने तो अहवाल फ्रान्सच्या संसदेत मांडला का, असा सवाल त्यांनी केला.
मोदी सरकारकडून व्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे. निवडणूक आयोग, न्यायालय, संसद सर्वाना त्यांनी धाब्यावर बसवले आहे. ते काहीही करू शकतात. काय चाललंय काहीच कळत नाही, असा टोला हाणतानाच मोदींनी स्वतःची वेगळी लोकलेखा समिती स्थापन केली आहे का, असे त्यांनी विचारले. लोक लेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस गटनेता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कॅगचा कोणताही अहवाल लोकलेखा समितीसमोर आलेला नाही असे स्पष्ट केले.
पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाहीत ? ते मीडियासमोर का येत नाहीत ? आमचे तीन चार प्रश्न आहेत. ५२६ कोटींचे विमान १६०० कोटीत का घेतले ? हालकडून कंत्राट काढून अनिल अंबानींना का दिले ? अशा फैरीच राहुल यांनी झाडल्या. जेव्हा कधी या प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी होईल तेव्हा, मोदी आणि अंबानी ही दोनच नावे समोर येतील, असे राहुल यांनी ठणकावले. कुणाला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.