चीनने पुन्हा रोखली अझहर मसूद वरील बंदी
- भारताच्या प्रयत्नांना केला विरोध
वॉशिंग्टन – संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाकडे भारताने पाकिस्तानच्या जैश ए मोहंमद या संघटनेचा प्रमुख अझहर मसूद याच्यावर निर्बंध लागू करावेत असा प्रस्ताव दिला आहे. त्याला चीनने पुन्हा कोलदांडा घातला आहे. या संबंधात चीनचे विदेश मंत्री वॉंग यी यांनी म्हटले आहे की भारताच्या या प्रस्तावावर सुरक्षा मंडळात एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य होण्यासारखा नाही. शिवाय हा विषय भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांशी संबंधीत आहे. त्यांच्यात आधी या विषयावर एकमत होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यात संयुक्तराष्ट्रांनी पडण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरात उरी येथे हवाईदलाच्या तळावर हल्ला करण्याच्या प्रकारापासून भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे अझहर मसुदचा हात असल्याने त्याच्यावर निर्बंध लागू करावेत अशी भारताची मागणी आहे. परंतु या आधीही अनेक वेळा चीनने त्यात खोडा घातला आहे. चीन हा संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा कायम सदस्य असून त्यांच्याकडे व्हेटोचे अधिकार आहेत. त्याचा वापर करून त्यांनी भारताच्या या प्रस्तावाला सातत्याने खोडा घातला आहे.
भारताच्या या प्रस्तावाला ब्रिटन, अमेरिका आणि फ्रांसचा पाठिंबा आहे. चीनच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे की या प्रस्तावावर भारत आणि पकिस्तान यांच्यात आधी एकमत झाले पाहिजे. ते नसेल तर त्या प्रस्तावाला पाठिंबा देता येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या विषयावर एकमत झाले तर हा विषय पुढे नेणे अवघड नाही असे विधान त्यांनी केले आहे. पण पाकिस्तानकडून या प्रस्तावाला मान्यता मिळणे अशक्य आहे. पण तरीही चीनने हा विचीत्र आग्रह धरण्यामागे त्यांची अडेल भूमिकाच कारणीभूत आहे असे सध्याचे चित्र आहे.