गणेशोत्सवानंतर होणार गुन्हेगारांचा ‘बंदोबस्त’
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. वाहतूक कोंडीतून थोडी उसंत मिळाल्यानंतर शहरातील छोटे-मोठे गुन्हेगार आता त्यांच्या रडारवर आले आहेत. गणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. आयुक्तालयात शनिवारी (दि. 15) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारताच काही दिवसात हिंजवडी येथील 54 कंपन्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी सोडून जाणार असल्याची ‘फेक न्यूज व्हायरल’ झाली. याची गंभीर दखल घेत आयुक्त पद्मनाभन यांनी स्वतः हिंजवडीच्या रस्त्यावर उतरून वाहतूकीचा आढावा घेतला.
आयुक्तांनी निरीक्षण करून हिंजवडीमध्ये चक्राकार वाहतूकीचा बदल सूचवला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूकीतील या बदलांना स्थानिकांनी विरोध केला. मात्र, या बदलांमुळे स्थानिकांना कसा फायदा होणार हे आयुक्तांनी त्यांना विश्वासात घेत समजावून सांगितले. काहीच दिवसात स्थानिकांना देखील या बदलाचे फायदे दिसू लागल्याने स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच आयटीयन्सने देखील आयुक्तांच्या निर्णयाचे भरभरून कौतुक केले.
शहराच्या इतर भागाची देखील पाहणी करून आयुक्तांनी बदल सुचवले. वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणार्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्याने वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता आयुक्तांनी गुन्ह्यांच्या फायलींची चाचपणी सुरु केली आहे. वाहतूक कोंडी पाठोपाठ शहरातील गुन्हेगारीमुळे देखील नागरिक हैराण असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारांची माहीती घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गणेशोत्सवसानंतर शहरातील गुन्हेगारांवर कारवायांचा धडाका सुरु करणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. आयुक्तालयापूर्वी परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. तलवारीचा नंगा नाच शहरवासीयांनी पहिला आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी तसेच त्या गुन्ह्याची माहिती त्यांनी मागवली आहे. यापूर्वी घटनेनंतर केवळ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.