खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यामुळे शिरुरचा विकास खुंटला
भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विकास रासकर यांचा आरोप
मंचर – शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघाचा विकास खुंटला आहे. तसेच खेडचे विमानतळ केवळ आढळराव-पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे पुरंदरला गेले. शिक्रापुरला वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच आहे. पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण रखडला आहे. त्यामुळे शिरुर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विकास रासकर यांनी केली आहे.
मंचर येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रासकर म्हणाले खासदार आढळराव-पाटील हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात अपेक्षित कामे केलेली नाहीत. त्यांनी १५ वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही भरीव काम केलेले नाही. वाघोली- शिक्रापूर परिसरात वाहतुक कोंडी कायम आहे. अष्टविनायक तसेच भिमाशंकर रस्त्यासह पुणे- नाशिक महामार्गाचे रुंदीकरण रखडला आहे.
खेडमधील विमानतळ केवळ आढळराव-पाटील यांच्यामुळे पुरंदरला गेले आहे. विमानतळ होण्यासाठी कोणतीही बाधा नव्हती. परंतू आढळराव-पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विमानतळ होवू शकले नाही.
शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून ३ आमदार व असंख्य नगरसेवक निवडून आले आहेत. हा मतदारसंघ भाजपाला मिळायला हवा, भाजप येथून प्रबळ उमेदवार देणार असून मी स्वत: दावेदार असल्याचे रासकर यांनी सांगितले. मात्र, शिवसेना-भाजपा युती झाल्यास शिरुरची जागा सेनेला गेल्यास येथील उमेदवार बदलण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.