‘खटला उभा करण्यासाठी ७ हजार पानांचे आरोपपत्र लागले’
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांविरोधात सुप्रीम कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले असून यावर सुप्रीम कोर्टातील बचाव पक्षाच्या वकील इंदिरा जयसिंह यांनी पोलिसांना चिमटा काढला. ‘खटला उभा करण्यासाठी तुम्हाला सात हजार पानी आरोपपत्र सादर करावे लागले’, असे त्यांनी सांगितले.
नक्षलवादी संघटनांशी संबंध तसेच एल्गार परिषदेचे आयोजन करुन भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारास चिथावणी दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. सात हजार पानी हे आरोपपत्र आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात अटक केलेल्या कार्यकर्त्यांविरोधात ८ डिसेंबरपर्यंत पुणे न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयातही सादर करावेत, असे आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिले होते. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टातील वकील इंदिरा जयसिंह यांनी या प्रकरणातील आरोपपत्र वाचण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल, असे सांगितले. ‘तुम्हाला खटला उभा करण्यासाठी तब्बल सात हजार पाने लागली’, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी पुढील तारीख दिली.