कोल्हापूरचे ‘ह्रदय’ आणि ‘लिव्हर’ पिंपरीत दाखल ; वाहतूक पोलिसांचा ‘ग्रीन काॅरिडोर’
पिंपरीतील डी.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यांदाच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
अवघ्या तीन तासात अडीशे किमीचे अंतर रुग्णवहिकेने केले पार
विकास शिंदे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – कसबा बावडा (कोल्हापूर ) येथील डायमंड रुग्णालयातून ब्रेनडेड रुग्णांने केलेल्या अवयवदानामुळे पिंपरीतील दोघांचे प्राण वाचणार आहेत. कोल्हापूरातून आणलेले ‘ह्रदय’ हे थेरगांवच्या आदित्य बिर्ला हॅास्पीटलला तर ‘लिव्हर’ पिंपरीतील डॅा. डी.वाय.पाटील रुग्णालयास रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेतून दाखल झाले. त्यावेळी कोल्हापूर ते पिंपरी अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॅारिडोर तयार करण्यात आला. अवघ्या तीन तासात रुग्णावहिकेने 248 किमीचे अंतर कापले आहे. दरम्यान, पिंपरीतील डॅा.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यादांच लिव्हर प्रत्यारोपण आज (रविवारी) शस्त्रक्रिया पार पडली आहे.
कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील डायमंड रुग्णालयात सोशल वर्करने एका ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अवयवदानाचे महत्त्व सांगून ते इतर गरजू रुग्णांना कसे उपयोगी पडतील हे पटवून दिले. त्यासाठी त्यांना समुपदेशन केल्यानंतर अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी त्याचे हृदय, लिव्हर, अन्य अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूरातून रविवारी सायंकाळी 5 वाजता निघालेली रुग्णवहिका पिंपरीतील डॅा.डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या आवारात रात्री 8 वाजता पोहोचली. रुग्णवहिकेतून हे ह्रदय आणि लिव्हर रस्ता मार्गाने पिंपरीत आणण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शहर आणि ग्रामीण विभागाच्या वाहतूक शाखेतील पोलीसांनी ग्रीन कॅारिडोर तयार केला होता. त्यामुळे रुग्णवहिकेने तीन तासात तब्बल 248 किमीचे अंतर पार केले. हे लिव्हर आणि ह्रदय आणण्यासाठी रुग्णवहिकेसोबत चार जणांची टीम कार्यरत होती.
दरम्यान, पिंपरीतील डॅा. डी.वाय.पाटील रुग्णालयात अशोक नन्ना यांना लिव्हर ची आवशकता होती. त्यानूसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली. त्यानूसार कोल्हापूरातून हे लिव्हर आणण्यात आले. त्यांची शस्त्रक्रिया रविवारी रात्री 8 वाजता सुरु करुन त्यांच्यावर प्रत्यारोपण करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी पिंपरीतील डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या विश्वस्त भाग्यश्री पाटील व डॅा. यशराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी देताच टीम कामाला लागली
नातेवाइकांनी होकार देताच शनिवार रात्रीपासूनच कोल्हापूर, मुंबई येथील वैद्यकीय विभागातील सूत्रे वेगाने हलली. मुंबई येथील झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीची मान्यता घेण्यात आली. रविवारी दुपार पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर कोल्हापूर ते पिंपरी असा ग्रीन कॅारिडोर करण्याचा निर्णय झाला.
अद्याप 12 हजाराहून अधिक रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत
सध्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. सद्य:स्थितीत राज्यभरात सुमारे 12 हजारापेक्षा अधिक नोंदणीकृत रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. या रुग्णांना पुनर्जीवन देण्याच्या दृष्टिकोनातून अवयवदानाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करण्याकरिता केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994लागू केला असून त्यामध्ये सुलभता आणण्याकरिता सन 2011 मध्ये सुधारणा करुन नातेवाईकांची कार्यकक्षा वाढविण्यात आली आहे.