केंद्रीय पथकाकडून सांगोल्यात दुष्काळाची पाहणी दहा मिनिटात आेटोपली
सांगोला – दुष्काळाची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सांगोल्यातील राजापुरात येवुन धडकले. दुष्काळाची केवळ दहा मिनिटात पाहणी करुन हे त्यावर उपाय योजना करण्यासाठी केंद्राकडे अहवाल सादर करणार आहे. त्यांच्या दौ-यामुळे तालुक्यातील दुष्काळ निवारण्यासाठी कोणत्या उपाययोजना होणार व त्याचा प्रत्यक्ष लाभ शेत-यांना कसा मिळणार यावर संबंधत पथकातील अधिका-यांनी माैन पाळले.
हे पाहणी पथक येणार म्हणुन त्यांच्या तयारीसाठी मागील कित्येक दिवस शासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू होती. काल या पथकाच्या सदस्यांनी फक्त 10 मिनीटाचा वेळ देवुन तालुक्यातील दुष्काळाची माहिती घेतली.
सांगोला तालुक्यातला दुष्काळाचा पाहणी दौरा करण्यासाठी काल केंद्रीय पथक तालुक्यातील राजापुर गावातील यशवंत पुजारी यांच्या शेतात येवुन गेले. या पथकांमध्ये सुभाषचद्र मीना, एम.जी. टेंभुर्णे व विजय ठाकरे यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नाना सोनवणे, सहआयुक्त प्रमोद बाबर, तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्यासह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातला दुष्काळासंबंधी निवेदन देण्यासाठी आ. गणपतराव देशमुख यांनीसुध्दा वेळेवर उपस्थिती दाखविली. पण दुष्काळाचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या पथकाने मात्र आपला दौरा फक्त 10 मिनीटांतच उरकल्याने अधिका-यांनी सुटकेचा निश्वास सोडला.