केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे.
हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 1 जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तर 61 लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू झाली होती.
महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 6 हजार 112 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर 2018-19 या आर्थिक वर्षातील जुलै 2018 ते फेब्रुवारी 2019 या आठ महिन्यांच्या कालावधीत हा भार 4 हजार 074.80 कोटी रुपयांवर जाईल.