काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, मित्रपक्षांना सोडणार आठ जागा
मुंबई – लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे, मात्र, महाआघाडी न झाल्यास काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा सोडतील. महाआघाडी झाल्यास काँग्रेस लोकसभेच्या 48 जागांपैकी 22, तर राष्ट्रवादी 18 जागा लढवण्याची चिन्हं आहेत. महाआघाडीत प्रकाश आंबेडकर आल्यास भारिप बहुजन महासंघाला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. तर स्वाभिमानी, माकप, हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी, आणि रिपाइं कवाडे किंवा गवई गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्याच्या जागा वाटपानुसार मनसेला महाआघाडीमध्ये स्थान दिसत नाही. मात्र, राज ठाकरेंशी हातमिळवणी झाल्यास मनसेच्या वाट्याला लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.