breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कामगार रुग्णालयाची दुर्दशा

वरळीतील इमारतीत ठिकठिकाणी भेगा, मोडक्या खिडक्या; अत्यावश्यक उपकरणांचीही कमतरता

मुंबई : राज्य कामगार विमा आयोगाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने वरळीच्या राज्य कामगार विमा (ईएसआयएस) रुग्णालयाची व इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या खिडक्यांवरचे ‘पॅरापिट’ ढासळले असून त्यातून शिगा बाहेर आल्या आहेत. तसेच खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. औषधे आणि आवश्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत.

वरळीच्या या ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ५ रहिवासी इमारतीही आहेत. सर्व इमारतींच्या भिंती आणि स्लॅबला भलीमोठी भगदाडे पडली आहेत. येथील नागरिक दीनानाथ कुमार यांची गरोदर पत्नी या रुग्णालयात दाखल आहे. मात्र त्यांना डॉक्टरांनी लिहून दिलेले टॉनिक इथल्या मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. ‘‘या रुग्णालयात फक्त गरोदर महिलांसाठी वेगळा वॉर्ड आहे. इतर महिला रुग्ण आणि लहान मुले यांना एकाच वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. सर्वप्रकारच्या पुरुष रुग्णांसाठीही एकच वॉर्ड आहे,’’  असे कुमार यांनी सांगितले. त्यांना माहिती अधिकाराअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या काळात रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीवर ७६ लाख ४६ हजार ७६३ रुपये खर्च केला गेला आहे.

‘‘४ वर्षांपूर्वी इमारतीचे संरचना परिक्षण झाले आहे. त्यानुसार आवश्यक त्या दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत. ईएसआयएसकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी भिंतींची अवस्था खराब आहे, मात्र इमारत धोकादायक नाही. पूर्वी दिल्लीच्या सेंट्रल रेट कॉन्ट्रॅक्टकडून औषधे खरेदी केली जात होती. तेव्हा पुरवठा सुरळीत सुरू होता. पण जुलै २०१७ मध्ये शासनाने काढलेल्या आदेशानुसार सर्व शासकीय रुग्णालयांना औषधे आणि उपकरणे हाफकिनकडून खरेदी करावी लागतात. प्रत्येक औषधासाठी हाफकिन निविदा काढते.

ही प्रकिया अतिशय वेळकाढू असल्याने औषधे वेळेवर उपलब्ध होत नाही,’’ अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. जी. कोळनूरकर यांनी दिली.

कोळनूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयाकडून १६० औषधे तीन महिन्यांसाठी मागवण्यात आली होती. सध्याही असाच प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयात प्राथमिक तपासणी उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र सेल काऊंटर, सीटीस्कॅन, एमआरआय उपकरणे नसल्याने रुग्णांना इतर ठिकाणी पाठवले जाते.

या रुग्णालयाचा एक मजला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयाला देण्यात आला आहे. त्यामुळे ३०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या १५० खाटाच कार्यान्वित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button