काँग्रेसमुळेच चहावाला पंतप्रधान झाला; खर्गे यांची मोदींवर खोचक टीका
मुंबई: काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रभारी आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘काँग्रेसने देशातील लोकशाहीचे संरक्षण केले. त्यामुळेच या देशात एक चहावाला पंतप्रधान बनू शकला,’ अशी खोचक टीका खर्गे यांनी केली आहे.
मुंबईत आयोजित काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘काँग्रेसने गेल्या ७० वर्षात काय केले? असा प्रश्न पंतप्रधान प्रत्येक कार्यक्रमात विचारत आहेत. काँग्रेसने ७० वर्षात लोकशाहीचे संरक्षण केले. त्यामुळेच त्यांच्या सारखा चहावाला पंतप्रधान बनू शकला,’ असे खर्गे म्हणाले.
‘इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर विनाकारण टीका केली जात आहे. भाजपकडून ही टीका केली जात आहे,’ असे सांगतानाच ‘४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीबाबत मोदी बोलतात पण गेल्या ४ वर्षापासून देशात अघोषित आणीबाणी लागू आहे त्याचं काय?’ असा सवालही खर्गे यांनी केला.