काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान मोदींना रक्ताची पत्रं, पुलवामाचा बदला घेण्याची मागणी
पुणे – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या काँग्रेसच्या पन्नास कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याचे ठरवले आहे. तसेच पुलवामाचा बदला घ्या अशीही मागणी या पत्रांमधून करण्यात आली आहे.
प्रिय मोदीजी ‘मन की बात के बदले खून की बात’ चाहीये, इंडिया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक, हमे निंदा चाहिये… और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए, जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा, नोटाबंदी नको तर दहशतवाद बंदी करा असा मजकूर असलेली ही पत्र या 50 जणांनी स्वतः रक्ताने लिहिली आहेत. पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागुल आणि त्यांच्यासह 49 कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली असून याबाबत अमित बागुल म्हणाले की, सीमेवर जवान शहीद होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
तर ते पुढे म्हणाले की, आम्ही 50 जणांनी स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहिली आहेत. ती ईमेल आणि कुरियर च्या माध्यमातून पंतप्रधाना पाठवण्यात येणार आहेत. या पत्रांची दखल घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.