कचरा प्रश्नावर एका महिन्यात ठोस उपाययोजना करू: मुख्यमंत्री
पुणे : कचरा प्रश्नी आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांशी कचरा डेपो प्रश्नी सविस्तर करण्यात आली. बैठकीत महापालिकेने महिनाभरात कचरा प्रश्नावर आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आज अखेर 23 दिवसांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्याच्या कोर्टात पुण्याची कचराकोंडी फुटली आहे.
या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरुलीधर मोहळ, खासदार अनिल शिरोळे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, पुणे महापालिकेत कायम स्वरूपी कर्मचारी करण्याचा आणि कचरा डेपोसाठी गेलेल्या ग्रामस्थांना कैपिंगची जागा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक आमदार जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, पुणे शहरात छोटे छोटे प्रकल्प उभारले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली असून यावर सकारत्मक चर्चा देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या बैठकीतून कायमचा तोडगा निघण्यास मदत झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कचरा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाठ पुरावा केला अखेर आज कचरा प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्र्याची आभारी आहे.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणे शहरातील कचरा प्रश्न सुटला असून मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार शहरात छोटे छोटे प्रकल्प राबविले जाणार आहे. त्याच बरोबर एक महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांना प्लान सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील 22 दिवसाच्या आंदोलनाच्या कालावधीत ग्रामस्थ कचरा डेपोच्या ठिकाणी भजन कीर्तन,जागरण गोंधळ,अर्ध नग्न आणि काल बुधवारी अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला अखेर आज झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत कचरा प्रश्नावर मार्ग काढण्यात यश आले आहे.
त्याच बरोबर खासदार संजय काकडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी मुख्यमंत्री पुण्यात आल्याने ही बैठक जुळून आल्याची चर्चा पुणे शहरात ऐकण्यास मिळत असून लग्न नसते तर आणखी किती वेळ पुणेकरांना कचरा कोंडीत रहावे लागले असते, अशीही चर्चा रंगली आहे.