एका सेकंदात भाजप कार्यालय ताब्यात घेईल, ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार राडा सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची मंगळवारी रॅली निघाली होती. त्यावेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणावरून पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी चांगल्याच संतापल्या, म्हणाल्या तुमचे नशीब चांगले आहे, मी शांत बसले आहे. अन्यथा एका सेकंदात भाजप कार्यालय ताब्यात घेईल, असा इशारा अमित शहा आणि भाजपला दिला आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी मंगळवारी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला. भाजपाचे पोस्टर, झेंडे तोडून टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. असा, आरोप अमित शहा यांनी लावला आहे.
अमित शहा स्वतःला काय समजतात,देशात सर्वश्रेष्ठ तेच आहेत का? स्वत;ला ते देव समजतात का? कुणीही त्यांच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही का? असे म्हणत ममता बनर्जी यांनी अमित शहांचा समाचार घेतला. अमित शहा यांच्यावर ममतांनी समाजसुधारक विद्यासागर यांची मूर्ती तोडण्याचे आरोप लावले. भाजपने १९ रोजी होणाऱ्या मतदानासाठी बाहेरून लोक आणली असल्याचा आरोप सुद्धा ममता बनर्जी यांनी यावेळी केला.
शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. त्याआधीच, तिथे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अमित शहांच्या रॅलीवेळी झालेल्या राड्यानंतर ममता बनर्जी आणि अमित शहा यांच्यात एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते ममता बनर्जींना घेरण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.